केंद्र सरकार ताजमहलसह इतर ऐतिहासिक पर्यटन स्थळे खुली करून पर्यटन क्षेत्राला चालना देत आहे. त्याच पार्श्वभूमीवर ऐतिहासिक औरंगाबाद परिसरातील पर्यटन क्षेत्र सुरू करावे, अशी आग्रही मागणी औरंगाबाद पर्यटन विकास मंडळ तसेच औरंगाबाद फर्स्टच्या पदाधिकार्यांनी पालकमंत्री सुभाष देसाई यांची भेट घेत केली.
औरंगाबाद फर्स्टचे अध्यक्ष मानसिंग पवार, पर्यटन विकास मंडळाचे जसवंत सिंग राजपूत, अरबाज अन्सारी, श्रीकांत जोगदंड आदींनी आज पालकमंत्री सुभाष देसाई यांची भेट घेतली. गेल्या सहा महिन्यापासून पर्यटन उद्योग ठप्प झाला आहे. त्यामुळे या क्षेत्रात काम करणार्या असंख्य हातांना कामच उरले नाही. परिणामी हजारो कुटुंबावर बेरोजगारीचे संकट कोसळले आहे. केंद्र सरकार हळूहळू ताजमहलसह इतर ऐतिहासिक पर्यटन स्थळे खुली करत आहे.
औरंगाबाद शहर तसेच जिल्ह्यात ऐतिहासिक पर्यटन स्थळ आहेत. त्यामुळे हे क्षेत्रही खुले करावे, दररोज पाच हजार पर्यटकांची परवानगी द्यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.